बुटीबोरी: आजादीच्या ७५ व्या भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महत्सवानिमित्त नगरपरिषदने परिसरातील शालेय विद्यार्थ्यांकरीता प्रश्नमंजुषा आयोजित केली होती. परिसरातील जवळपास १०० बुद्धीवंत शालेय विद्यार्थी या परीक्षेमध्ये सहभागी झाले. परीक्षा केंद्रावर सकाळी ११ पासूनच जिजामाता, सरस्वती किसान विद्यालय, ड्रीम स्कूल, बालाजी कॉन्व्हेन्टमधील परीक्षार्थ्यांची गर्दी जमली. ‘भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास व संविधान’ या विषयावर १०० गुणांचा पर्यायी लेखी पेपर घेऊन विद्यार्थ्यांची बौद्धीक क्षमता पडताळण्यात आली.
परीक्षा पर्यवेक्षक म्हणून सुभाष श्रीपदवार, मिलिन पाटील, आनंद नागपुरे, समीर गणवीर, संजय संतोषवार, संवर्ग नगर परिषद अधिकारी यांच्या देखरेखीत ही स्पर्धा परीक्षा घेण्यात आली. अशा प्रकारच्या परीक्षेत सहभागी होणे गरजेचे असून प्रश्न परीक्षेमुळे विद्यार्थ्यांत स्पर्धेची भावना निर्माण होते. सोबतच पुढील स्पर्धा परीक्षेचा सराव होत असल्याचे न.प. शिक्षण सभापती विनोद लोहकरे यांनी सांगितले. केंद्रावर मुख्याध्यापिका जयश्री टाले, मुख्याध्यापक प्रवीण भोयर, निखिल साबळे, गुलक्से गुरुजींसह शिक्षक नितीन कुरई उपस्थित होते.