butibori

वाहनाच्या धडकेत वर्धेतील दोन मित्र ठार

बुटीबोरी : नागपूरवरून दुचाकीने गावी परताना दोन मित्रांना अज्ञात वाहनाने चिरडल्याची घटना गुरुवारी (१० मार्च) मध्यरात्रीच्या सुमारास बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आसोला येथे घडली.

जयंत केशव मुजबैले (२७) व जगदीश सुनील साकरकर (२६) रा. दोघेही केळझर, ता. सेलू, जि. वर्धा अशी मृतांची नावे आहे. या घटनेने केळझर गावात शोककळा पसरली आहे. माहितीनुसार, दोघेही मृतक जिवाभावाचे मित्र होते.

ayanshtvs butibori

जयंतचा पानटपरीचा तर जगदीशचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय होता. जयंतच्या मित्राचे लग्न असल्याने त्यांना नागपुरात काही खरेदी करायची होती, तर जगदीशला त्याच्या व्यवसायानिमित्त सीएला भेटायचे होते. दोघांनीही ९ मार्चला दुचाकी पल्सर क्रमांक एमएच ३२/ एआर ८८५० ने नागपूरला जात होते. दोघांचेही काम आटोपल्याने ते गावाकडे परत निघाले. खूप रात्र झाल्याने घरच्यांना काळजी नको म्हणून आम्ही परत येत आहोत, असे सांगत केळझर येथील मित्र संजय मेश्राम यांना रात्री सव्वाअकराच्या सुमारास कळविले.

त्यावेळी ते चिचभुवन या ठिकाणी होते, असे मेश्राम यांचे म्हणणे आहे. रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास आसोला या ठिकाणी पोचले असता ब्रेकरवर अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. त्यात ते दोघेही चिरडले गेले. त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती बुटीबोरी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता स्थानिक रुग्णालयात पाठविला. आरोपी वाहनचालक पसार आहे. पुढील तपास बुटीबोरी पोलीस करीत आहे ।